Thursday, April 9, 2015

मनीच्या कथा ४

पुढच्या प्रवासाला निघताना गाठीशी खरेतर कुठलीच गाठ नसावी. त्या सोडवून मोकळं होता येत असेल तर नथिंग लाईक इट. कुठलीही गोष्ट नीट पाहता यावी, जोखता यावी यासाठी पारदर्शी असणे आलेच. आवश्यक असते ते. आणि जितकं स्पॉटलेस, गाठी विरहित अंतरंग, तितका प्रवास निश्चिंत. पापण्या ओलावणारी असो नाहीतर मन बहरवणारी, कुठल्याच आठवणीची गाठ पडायला नको. कारण गाठ म्हणजे धाग्यांच्या आत काहीतरी बांधून ठेवणे. आणि बंधन कुठलेच सुखकारक नसते. बांधून घेणे कुणालाच आवडत नाही. मोकळा श्वास म्हणजेच जगणे. आणि जर मोकळा श्वास आणि जगणेच नसेल तर मग शरीराच्या हालचालींना काय अर्थ?
'ती'ला पाहून असंच काहीसं कायम वाटत राहायचं. माहेर, तिथली माणसं, प्रेम विवाह करून मिळालेले सासर तिथली माणसं आणि तिला आवळून ठेवणारं आणखी एक सत्य - तिचं बाळ.
तसं विरोध पत्करूनच त्याच्याशी लग्न केलं तिनं. पण लग्नापूर्वीचे प्रेम आणि लग्नानंतरच्या बायकोच्या अपेक्षा यातील फरक ओळखायला दोघांनाही वेळच मिळाला नाही. तो नेमका कसा आहे, हे तिला जे ठाऊक होतं.  त्यातील सत्य ताडून पाहण्यासाठीची परिस्थिती तिला उपलब्ध नव्हती. हाच आपला जोडीदार, या निर्णयाप्रत येतानाचे गाठीचे अनुभव पुरेसे नव्हते आणि नाण्याची दुसरी बाजू पाहण्यासाठी काही उपाय नव्हता. तिच्यावरच्या निस्सीम प्रेमापोटी घरच्यांनीही तिचं मन राखलं आणि ती आणि तो विवाहबद्ध झाले. 
पहिले काही इतरांचे जातात तसेच दिवस मजेत गेले. पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. त्याच्या वागण्या-बोलण्यातील तिच्या दृष्टीनं असलेल्या चुका आता त्यांच्या नात्याला बोचू लागल्या. सासरची मंडळी आणि त्या घरातील वातावरण तिच्यासाठी सामान्यतः जसे असायला हवे तसे नव्हते. तिच्या माहेरचे तिचे अनुभव तिच्यासाठी प्रमाण होते आणि त्याच्यासाठी त्या घरची परिस्थिती अनोळखी होती. आता त्याच्या आणि तिच्या अनुभवांचा वाद सुरु झाला होता. योग्य अयोग्य ठरवताना कुणाचेच बरोबर ठरत नव्हते आणि त्यातच तिची घुसमट सुरु झाली. पीळ बसला आणि तो त्यांच्या नात्याभोवती आवळू लागला.
जे घडत होतं ते कुणाजवळ बोलणार? घर आणि घरातील मंडळी यांना मित्र-समान मानत आलेली ती जाऊन जाऊन जाणार कुठे? मग मन मोकळं करायला आई शिवाय पर्याय नव्हता. ती मग सांगायची. जे त्याच्यात आणि तिच्यात घडत होतं ते आणि त्यासाठी ती ज्या लोकांना आणि परिस्थितीला ती जबाबदार धरत होती, ते सारं काही ती सांगू लागली. मग त्याबद्धल ऐकणाऱ्यांची मतं बनत गेली. कुणाची चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे दुसरी बाजू ऐकून न घेताच ठरत गेले. 
ती सांगायची तेच प्रमाण होतं कारण ती त्यांची होती. तो दुसरा होता. तिकडे तो विचार करायचा ते कुणी कधी ऐकून घेतलं नाही. त्याची गरजच वाटली नाही कुणाला. अगदी त्यालाही. आपल्या घरच्यांचे स्वभाव त्यालाही ठाऊक होते आणि त्याबाबत त्याचीही स्वतंत्र मतं होती. पण त्या आपल्या विचारांना खत पाणी घालण्यापेक्षा तो कामात रमला. पण त्याचं गाडं जरा लंगडं होतंच. आर्थिक बाजू भक्कम नसली की व्यक्तिमत्वाचा कणाच कायम मोडका दिसतो. तो ही असाच तिच्यापुढे वाकलेलाच दिसू लागला. तिच्या लोकांनाही आणि त्याच्या घरच्यानाही. पण अजूनही चूक कोण आणि बरोबर कुणाचे हे ठरत नव्हते.
रोजच्या या आवळून घेणाऱ्या परिस्थितीत मार्ग निघत नव्हता. शेवटी त्याने बोलायचे ठरवले.
"अनेकदा स्पष्ट जाणवतं की काही गोष्टी थेट बोलून दाखवता आल्या असत्या तर ज्यांच्यात जीव गुंतलाय त्यांची आयुष्य सावरता आली असती. पण आपण बोलायच्या आणि समोरचा व्यक्ती ते सत्य ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. आपलं माणूस म्हणून त्याचे मन दुखावू नये, हा शिरस्ता. पण आपल्या माणसाने सांगितले म्हणून दुखलं एखाद्यावेळी मन तर समजून घ्यावं ना? ही कसली नाती उराशी कवटाळली आहेत आपण, जिथे सत्याला मोकळा श्वासच घेता येत नाही? चुकला चूक आणि बरोबरला बरोबर, इतकं स्वच्छ बोलणं का नाही? सांभाळून घेताना आणि नाती जपण्यासाठी गोड गोड बोलून सत्य दडवण्याचा खोटेपणा करतोय आपण, हे स्वीकारण्याच धाडस कधी अंगी येणार? स्वतःच्याच माणसांशी खोटं खोटं वागतो आपण आणि तरीही म्हणतो ती आपली आहेत म्हणून हे असं वागणं. कारण त्यांचे मन दुखावू नये? शी! आता स्वतःच राग येतो. पण जाऊन धाडदिशी खरं खरं बोलणं ही जमेल का, याचा विचार करतोय मी. कारण घुसमट थांबवायची आहे मला. रोज गळ्याभोवती पाश आवळून घेण्यापेक्षा एकदा मोकळं व्हायचंय मला आणि त्यांनाही मोकळं करायचं आहे ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो. अर्थात मी जसा वागतोय त्या परिस्थतीत, त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचा दावा तरी कसा करू? प्रेमात खोटेपणा असतो का?"
तो स्वतःची आणि स्वतःच्या वागण्याची चाचपणी करत होता. तिला होणारा त्रास त्याला कळत होता आणि त्या त्रासाचा त्याला होणारा त्रास त्याला विश्लेषण करायला भाग पाडत होता. ती समंजस आहे, यात त्याला कधीच शंका नव्हती. घर म्हणून तिलाही तिचा संसार प्रिय होता आणि त्यासाठी ती प्रयत्न करताना त्यालाही दिसत होती. मग कसला गुंता होता की सारखे अडखळणे सुरु होते? 
तिला त्या घरातील काही लोकांच्या काही वागण्याचा प्रचंड मानसिक त्रास होत होता. तिला न पटणाऱ्या गोष्टी त्या घरात घडायच्या आणि ते तिला नकोसं वाटायचं. ती त्याला सांगायची. सुरवातीला तो ऐकून घ्यायचा. मात्र नंतर नंतर त्याला हे तिच्या आणि त्याच्या घरातील लोकांच्या सतत तुलनेचा वीट येऊ लागला. त्याच्या घरातल्या लोकांसंदर्भातील आणि वातावरणासंदर्भातील तिची निरीक्षणे त्याने नाकारली नव्हतीच. कारण त्याच्या घरच्यांना तो ही ओळखून होताच. पण त्याचा मुद्दा होता की तुझ्या माहेरचेपण एक विशिष्ट काही गुण-दोष मलाही दिसतात. मग आपण सतत त्यावर परस्परांना बोलणे आणि दोन घरांची सतत तुलना करावी का? 
तिला तिच्या घरातील दोष दिसतंच नव्हते. त्याच्या या बोलण्याने स्फोट झाला. "तो म्हणतो की तुझ्याही आई-वडिलांमध्ये दोष आहेत आणि तुमचे घरही काही आदर्श नाही." तिने तिच्या घरी सांगितले. तुलना खरं तर कुणालाच पसंत नसते आणि दोषारोपण होत असेल तर मग ते मान्य करणे अशक्य असते. "आमची उणी-दुणी काढतो? कसला एवढा माज आलाय त्याला? आहे तरी कोण तो? साधी एक कायम नोकरी मिळवू शकत नाही आणि आमचे गुण-दोष सांगतोय? आता तूच सांग, या अशा मुलाबरोबर तू संसार करणार ज्याला तुझ्या आई-वडिलांचा साधा सन्मान करता येत नाही?"
आणि ती घरी परतली.  (क्रमश:)

No comments:

Post a Comment