Friday, April 17, 2015

मनीच्या कथा ६

ती परत स्वतःच्या अस्तीवाच्या कक्षेत परत आली. तिचे स्वतःचे वर्तुळ आकाराने छोटे होते. आणि त्या छोट्या जागेत गरगर फिरताना भोवळ येतेच. स्वतःचेच असणे स्वतःला बोचू लागते. आपण जसे आहोत तसे का, या एका प्रश्नाने सोलवटून निघणेही अटळ असते. कारण स्वतःला जोखणे एक तर फार कठीण आणि ते एकदा सुरु झाले कि मग आपण स्वतःच्याच अंतरंगात धारदार शस्त्रानिशी घुसत जातो. अशा स्वतःच्या स्वतःवरील शस्त्रक्रिया म्हणजे अवघड काम असतं. पण त्याला पर्यायही नसतो. 
स्वतःच्या कक्षेत परत आली खरी, पण तिला हे अवघड काम जमेना. कारण आता तिला तिचे सारे 'चुकलेले' दिसू लागले. शिवाय चूक किंवा बरोबर असे काही नसते ग बाई, हे सांगणारेही कुणी नव्हते कारण ती कुणाशी याविषयी बोललीही नव्हती. इतरांना लावलेली फुटपट्टी आपण स्वतःला लावून पहिली की मग खरा हा अतरंगी 'अंतरंगाचा' प्रवास सुरु होतो. "ज्या गोष्टीसाठी त्याला बोल लावला तीच गोष्ट माझ्या हातून घडली. मग मी चुकले. जे मला कधीच नको होते ते त्याला करायला भाग पाडले. मी चुकले. आणि आता या सगळ्या चुका मान्य झाल्या आहेत तर दुरुस्त करायला परत जायचे?"
परतीचे प्रवास खूप अवघड असतात. त्यातही, आता कधीच परतायचे नाही, असे ठरवून/सांगून गेल्यानंतर तर हा प्रवास अशक्य वाटतो. "आपण आपलाच शब्द मोडायचा? परत जायचं? ज्यांना, परत येणार नाही, हे सांगितले होते त्यांच्यासमोर जाऊन उभं राहायचं? काय म्हणतील ते? आपण आपल्या चुका कबूल केल्या म्हणून आपल्याला पराभूत ठरवतील ते आणि मग आपला फायदा  उठवतील. मग कसे होणार आपले? कुठले तोंड घेऊन आपण यानंतर त्यांच्या चुकांवर बोट ठेवायचे? ते ही आपण चुका केलेल्या असताना?"
मन हे तलवारी सारखं असतं. दोन्हीकडे धार असणाऱ्या तलवारीसारखं. ते कापत सुटतं तुम्हाला. आणि खरंच आणखी एक व्यक्ती आपल्यात सहभागी असेल तर, ती आपल्याबद्दल काय विचार करेल, या विचारांनी आपण स्वतःला खूप जखमा करून घेतो. आपण काय विचार करतोय आणि तो योग्य की अयोग्य यापेक्षा तो स्वतःला पूर्णतः पटला आहे अथवा नाही किंवा मान्य आहे अथवा नाही, असा विचार करून कुठलाही निर्णय घेण्याऐवजी आपण असा कुठलाही निर्णय घेतल्यावर इतरांची त्यावर प्रतिक्रिया काय असणार याचाच जास्त विचार करतो. मग सगळा मामला बिघडतो. आपण स्वतःच्याच विचारांनी परिपूर्ण नसताना इतरांचेही विचार आपण करायचे आणि ते असेच वागतील, बोलतील, करतील असे एकांगी निर्णय घेत स्वतःच्या निर्णयांची गळचेपी करायची? किती योग्य आहे हे?
आपल्यासाठी आवश्यक असलेला विचार आपण करून, त्याचे विश्लेषण करून आणि मग तो स्वतःला योग्य वाटत असल्यास त्याचा पूर्ण स्वीकार करून कुठलीही कृती करणे आवश्यक असताना आपण फक्त आणि फक्त इतरांच्या संभावित विचारांचे ओझे स्वतःच्या डोक्यावर वाहतो. मी माझी कृती योग्य आहे आणि मी त्यावर ठाम आहे, हे सांगण्या ऐवजी आपण ती कृती केली तर इतर काय म्हणतील, याचा विचार आधी करतो आणि मग त्या अनुशंघाने निर्णय घेतो. मग असा निर्णय स्वतःचा आहे, असे म्हणता येईल का? 
तिचा आता गोंधळ उडाला होता. काय घडलं, कुठे बिनसलं आणि त्यात कुणी काय केले हे तिला कळले होते आणि म्हणून तिला परत जावेच लागणार होते. पण आता परत जाताना मात्र तिला पायात मणभर वजनाचे दगड बांधल्यासारखे झाले होते. तिला स्वतःची चूक कबूल करून परत जाताना नकोसे झाले होते. 
पण परतणे अटळ होते… (क्रमश:)
वर्षा वेलणकर 

1 comment:

  1. Self-belief and conviction are indeed rare commodities… rarer is the attitude to identify one’s own mistakes …and the rarest the courage to accept and correct those mistakes..

    ReplyDelete