Tuesday, April 30, 2013

पानगळ….

आठवणी जागवणं म्हणजे सुकलेल्या पानांवर पाण्याचा वर्षाव करण्यासारखा वाटतं. जे झालं त्यातील काहीच बदलणार नसतं आणि तरीहि त्याचा मागोवा घेणं म्हणजे सरून गेलेल्या वयाच्या शरीरावरील खुणा पुसण्याचा प्रयत्न करणं. पण आठवणी सोबत असतात. कायम. कधी वाऱ्याच्या झुळूकीसारख्या येतात. उन्हाळ्यात आल्या तर घाम वाळवत नाहीत पण सुखावून जातात. कडक हिवाळ्यात आल्या तर अंगावर काट फुलतो आणि काटे बोचरे असतात. पावसाळ्यात आठवणी म्हणजे काहीतरी वाहून नेणार नक्की. कधी शरीरातील गर्मी, कधी मनात साचलेला मळ आणि कधी कधी जे सगळ्यात प्रिय आहे तेच वाहून जातं; गमावल्याच दुःख मागे ठेवून.
 
आठवण दिसते. उन्हात तपातेल्या फरशीवर बदलीभर पाणी ओतलं कि काही वेळ खूप काही जाणवत राहतं - मातीच वास, थंडगार स्पर्श आणि थोडं गार वारही. पण पुन्हा फरशीवर कोरडेपणाचे तुकडे पडून ते वाढू लागतात तेव्हा वर्तमान आणि आठवण त्यात दिसतात. बादलीभर पाणी म्हणजे आठवण, तो क्षणभर आलेला थंडावा म्हणजे आठवण आणि ते कोरडेपणाचे भराभर वाढत जाणारे तुकडेही आठवणच होतात - थोडावेळ अनुभवलेल्या थंडाव्याची.
 
फोफावलेल्या वेलीवरची काही पानं वाळून सुकली तर त्यांना पाणी घालून उपयोग नसतो. आयुष्य पुढे पुढे जात आहे आणि कोवळी पानं जन्माला घालतानाच या आयुष्याच्या वेलीवर काही वृद्ध सुकलेली पानही दिसू लागली आहेत. काही घटना वाळल्या आहेत आता. पण त्याचं अस्तित्व नाही संपलं. कोरड्या झाल्यात त्या आणि आता तर निष्प्राणहि. पण दिसतात त्या नजरेला. पानं खुडून फेकून दिली तरीही जिथे उगवलं होतं ती खूण राहते फांदीवर तशीच. फेकून देतानाही सुकलेल्या पानाचा चुर्र आवाज होतो. काही आठवलं कि हे अस सगळ वाटतं. आठवण फांदीवर उगवली ती जागा, पानांचं वाढत जाणं, त्याचा आकार, रंग-रूप बदलणं आणि मग पिकून जाणं. सारा काही नजरेसमोर दिसतं. वाळलेलं पान खुडून टाकावं म्हणतात. पण खुडायला गेल तर सहज नाही तुटत ते. थोडा जीव असतो त्यात आणि म्हणून ते फांदीवर असतं. आणि ते असतं तोपर्यंत सारं काही असतं. आठवण असते - कधी प्रिय तर कधी अप्रिय, कधी हवी-हवीशी वाटणारी आणि मग नकोशी होत गेलेली, कधी आयुष्याच्या वेलीवर जीव ओतून जगवलेली आणि आता अगदी खुडून टाकावीशी वाटणारी.
 
पण निसर्गाचा नियम आहे म्हणतात. जे उगवलं ते जगतं आणि जातही. पान उगवतं, वाढतं, रंग बदलतं, पिकतं, वाळतं आणि एक दिवस खुडायची घाई केली नाही तर गळून पडतं. तुमचं लक्ष नसेल तर कुठलाही चूर्र आवाज न करता वाऱ्याच्या झुळुकीबरोबर कुठेतरी निघूनही जातं. मग वाटच पाहावी. काही आठवणींच्या पानगळीची .
 
वर्षा वेलणकर 

Tuesday, April 23, 2013

जागतिक पुस्तक दिवसानिमित्त...

जागतिक पुस्तक दिवसानिमित्त...
 
तसे कुठलेही दिवस वगैरे पाळायचे हा प्रकारच मुळात मला कधी आवडला नाही. पण पूर्वी ते पाळायचे नाही, हा हट्ट असायचा आणि आता ते डोक्यातही येत नाही. पण आज जागतिक पुस्तक दिवस आहे हे पाहिलं आणि वाटलं कि आज काहीतरी लिहावं. कारण मला वाचायला आवडतं. खूप आवडतं. कदाचित प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं असतं  आणि ते वेगळं काहीतरी पुस्तक आणि कथांमध्ये जितकं सहज मिळतं तितकं  ते इतर वेळा शक्य नाही. खरं  तर प्रत्येकाला परीकथा आवडतात आणि ती आपलीही असावी असा वाटतं. हा आभास पुस्तकातून नेहमी पूर्ण होताना लहानपणी तरी अगदी जाणवतोच. ते जे काही असेल नसेल, पण मला वाचायला आवडतं. 
लहान होते तेव्हा घरमालकाच्या मुलाकडे एक aluminium ची पेटी होती आणि त्यात तो पुस्तकं  ठेवायचा. जादूचा दिवा, काचेचा महाल, सोनेरी उडणारा घोडा, राजकन्या आणि पोपट अशी भरमसाठ पुस्तक तेव्हा त्यानं गोळा  केली होती आणि ती आम्हाला वाचायला मिळायची. त्यानंतर चंपक, लोटपोट, चाचा चौधरी, फास्टर फेणे, शिवाजी महाराजांच्या गोष्टी असं  ते वाचन विश्व विस्तारत गेलं. शाळेच्या वाचनालयाची ओळख पाचवीत असताना झाली आणि त्याच कारण होतं  वाचन स्पर्धा. त्यात भाग घेतला आणि वाचनालयाच्या प्रेमात पडले. किती वाचलं  हे नाही सांगता येत. नेमकं  जे वाचलं  ते सगळं  योग्य होतं  का, हेही निश्चित सांगता येणार नाही. शिवाय एक विशिष्ट विषय वाचला तो का, वगैरे प्रश्नही मला कधी सतावत नाही. ते हाती आलं  ते आवडलं  तर वाचत जायचं एवढा साधा हिशोब होता आणि त्याचा खूप खूप फायदा झाला. आनंद वाटतो कि नशीबवान होते हे सगळं  काही वाचता आलं . देवळात गेले नाही इतक्यावेळा मी पुस्तकाच्या दुकानात जाते. आणि ते सारे कपाटातले रचलेले देव पाहिले कि होणारा आनंद अवर्णनीय असतो. 
वाचलं  म्हणून लिहायची सवय जडली आणि त्या सवयीमुळे नोकरी मिळाली. पण त्या नोकरीत लिहित असताना वाचायचं राहून गेलं. गेले चार वर्ष नोकरी सोडली आणि पुन्हा वाचन यज्ञ सुरु झाला. इतकं  वाचतो आपण पण लक्षात राहून जाणारं फार कमी असतं. आज मला ठळक आठवतात अशी माझी आवडीची पुस्तकं  म्हणजे मृत्यूंजय, खलिल जिब्रानचं  The Prophet, ग्रेस याचं मितवा, रिचर्ड बाखचं जोनाथन livingstone सीगल, पु लची सगळी पुस्तकं, पाउलो कोएलोचं pilgrimage आणि द अल्केमिस्ट, त्यांची आत्मकथा. त्यांची तर सगळीच पुस्तकं  मी वाचली आहेत. पण एका पुस्तकान मला गेले काही दिवस अक्षरशः झपाटलं आहे आणि ते म्हणजे अ टेल फॉर द टाइम बीइंग. एका जपानी-अमेरिकन लेखिकेनं - रुथ ओझेकी - लिहिलेलं  हे पुस्तक फक्त अप्रतिम नाही पण खूप मनस्वी आहे. शिवाय ज्यांना कथा सांगण्याची आवड आहे - लिहून किव्वा प्रत्यक्ष - त्यांच्यासाठी तर हे एक आदर्श पुस्तक ठरेल कारण विषयाची गुंफण, कथेचा आवाका उत्कंठावर्धक पद्धतीनं सांगतानाच किती विषय एका कथेत हाताळता येतात हेही हे पुस्तक वाचताना कळत. 
पुस्तकांची आवड असणाऱ्यांना जुनी, दुर्मिळ पुस्तकं  कुठे मिळतील याची माहिती असणारा महाराष्ट्र टाइम्स मधला लेखही छान आहे. पण  त्यात फक्त मुंबईच्या अशा दुकानांचा उल्लेख आहे. शक्य असेल तर प्रत्येकान त्यांच्या शहरातील अशा दुकानांची माहिती काढावी आणि शेअर करावी म्हणजे अनेकांना ते सोप जायील. पुण्यात अशी बरीच ठिकाणं  आहेत. आज या दिवशी अशी दुकानं  शोधून त्यांची यादी करायचा मी निश्चय करते. बघू किती लवकर शक्य होतं ते. 
 
वर्षा वेलणकर 
 
  

Monday, April 8, 2013

वाटता वाटता वाटले, तैसे केले…

वाटता वाटता वाटले, तैसे केले…

 
खूप काही वाटतं आणि कायम वाटत राहतं. मला वाटतं म्हणून मी जे वाटतं ते करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मला वाटतं ते इतरांना कळवणे. पण कधी कधी असंही वाटतं कि कुणी तरी आपल्याला न सांगताही समजून घ्यावं. एक शब्दही न उच्चारता कुणी तरी एखाद्या पुस्तकाप्रमाणे आपल्याला वाचून काढावं. छे! अशा वाटण्याला काही अर्थ नसतो आणि ते कधीच पूर्ण होत नाही. पण वाटून घ्यायला काय हरकत आहे?
चार वर्षांपूर्वी जेव्हा मी या एका विचारावर खूप दिवस रेंगाळले तेव्हा लक्षात आलं कि हे वाटणं खूप खोल रुजलेलं आहे आणि त्याची सुरुवात मी शाळेत असताना झाली. खूप पाऊस पडतो आहे आणि जरी वर्गात बाई शिकवत असल्या तरी मला मात्र बाहेर पडणारा पाऊसच पाहायचा आहे, हे माझं वाटणं त्या शिक्षिकेला कळावं असं खूप प्रकर्षानं वाटलं. पण हे असं काही विचार करणं आणि ते प्रत्यक्षात येईल हि अपेक्षा करणं मूर्खपणाचं असतं हा साक्षात्कार व्हायला खूप वर्ष लागली. पण तेव्हा मला आणखी काहीतरी वाटलं. मला शाळेत परत जायची इच्छा झाली आणि मला त्या विद्यार्थिनींशी गप्पा माराव्याश्या वाटल्या. या वाटण्याचं काय झालं माहिती आहे? मी गेले परत शाळेत.
काही कारणाने मी माझी शाळा अजूनही गमावलेली नाही. माझ्यात माझी शाळा कायम आहे कारण तिथे जे काही मिळालं ते आजही माझी सोबत करतंय. पण शाळाही मला विसरली नाही. मला शिकवणाऱ्या काही शिक्षिका अजूनही आहेत तिथे आणि म्हणून मला पुन्हा परत जाता आलं. गेले आणि सांगितलं मला मुलींशी गप्पा करायच्या आहेत. कसल्या गप्पा? प्रश्न स्वाभाविक आहे आणि मला तो अपेक्षित होताच. म्हणून माझं उत्तरही तयार होतं . म्हटलं, त्यांच्या मनात जे सुरु असतं ना ते मी त्यांना बोलायला सांगणार आहे. अनेकांना मनातल्या मनात हसू आलं असेल. हेही स्वाभाविक होतं आणि मला अपेक्षितही. म्हणून पुन्हा माझं उत्तर तयार होतं. यावेळी प्रश्न नसतानाही. मी म्हणाले कि कुणाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला मी काही अंतरज्ञानी नाही. पण मला जे मनापासून वाटतं ते कृतीत येतं आणि कुणास ठाऊक मी जाणून घेण्यात यशस्वी ठरेनही. मला परवानगी मिळाली. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षिका आणि संस्थेचे संचालक यांचे मन:पुर्वक आभार.
आणि त्यानंतर सुरु झाल्या गप्पा. काही वर्षांपूर्वी मी ज्या स्थितीत होते तिथे आता या मुली होत्या आणि मी त्यांची ताई झाले होते. आणि या गप्पा इतक्या रंगल्या कि सलग दीड वर्ष आम्ही बोललो. खूप काही आणि सगळ्या विषयांवर अगदी मनसोक्त बोललो. कधी हसलो, रडलो, कधी गप्प बसलो आणि कधी गाणी म्हटली, नाचलो, हुंदडलो. मला जे कधीतरी वाटलं होतं ते मी फक्त त्यांना विचारला कि तुमच्या मनात काय सुरु आहे ते कुणाला तरी कळावं असं तुम्हाला वाटतं का आणि त्यांनी होकार भरला. नशीबानं मी माझ्या वाटण्यावर सतत विचार करत राहिले त्यामुळे त्याचं मन आणि वाटणं काय आहे हे जाणून घ्यायला मला वेळ लागला नाही. मी त्यांच्या वाटण्याला शब्द देत राहिले आणि त्यांनी मंजुरी दिली. कुणी जाणून घ्यावं इतकं छोटंसं काहीतरी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला मला आणि वाटलं माझं वाटणं सार्थ झालं.
आज हे सारं सांगावसं वाटलं कारण गेले काही महिने या गप्पांना खंड पडला आहे आणि मला वाटतं त्या पुन्हा सुरु व्हाव्यात. म्हणून मला वाटतं कि प्रत्येकानं स्वतःला जे वाटतं ते करावं. कधी कुठली अपेक्षा पूर्ण होइल कुणास ठाऊक!
वर्षा