Thursday, May 7, 2015

मनीच्या कथा ७

एखाद्यानं वागण्या-बोलण्यातून कधी दुखावलं असेल आपलं मन तर आपण कायम नंतर त्याच्या प्रत्येक कृतीत ती इतरांना दुखावणारी वृत्तीच शोधत बसतो. कुणी खोटं बोललं असं आढळून आलं तर त्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रत्येक विधानाला खऱ्या-खोट्याच्या पारड्यामध्ये बसवतो आपण. तो चुकला होता, हे कधीच विसरू शकत नाही आपण. त्याच्या पुन्हा चुका करणं थांबल्यावरही आपण त्याला मात्र स्वच्छ पाहूच शकत नाही. त्याच्या वागण्याने कधीतरी पोळलो गेलोय, आता पुन्हा जीभ भाजून घ्यायची नाही आणि म्हणून सगळ्या आतल्या जाणीवानिशी आपण रेट्याने त्या कधीतरी दुःख दिलेल्याला आपल्या कक्षेच्या बाहेरच ठेवतो. 
तिचे पुन्हा परत जाणे आणि स्वतःच्या चुकांच्या कबुलीजबाबानिशी जाणे याच्या वाट्याला मानवी स्वभावातील वरील सगळ्या गोष्टींचे भोग होते. आणि त्यामुळेच तिचे जाणे कठीण वाटत होते तिला. इथे पुन्हा प्रश्न निर्माण झाला होता, काय करावे, हा. पुन्हा तिचा स्वतःचा एक प्रवास आतल्या आत सुरु झाला होता. 
"मी… एक व्यक्ती म्हणून माझ्यातील गुण-दोषांसकट इतरांद्वारे स्वीकारली जावी हि एक अपेक्षा घेऊन जगते आहे का? आज मी माझ्यातील सर्व बाबींचा विचार करून स्वतःतील वैगुण्य अगदी स्वच्छपणे स्वीकारले आहे. पण ते इतरांनी का स्वीकारावे? माझ्या वागण्याचा, बोलण्याचा त्यांना जो त्रास झाला ते सारे त्यांनी का विसरावे? मला पुन्हा स्वीकारताना त्यांच्या मनावरचे ओरखडे जे केवळ माझ्यामुळे उठले आहेत, ते जातील? का मला पाहून त्या जखमा पुन्हा वाहू लागतील?
मी … मला जायला हवे कारण मला मनापासून त्या एका व्यक्तीबद्दल काही विशिष्ट भावना आहेत ज्याचा मी लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केला आहे. मला परत जायला आवडेल त्याच्याकडे. आणि माझ्या बाळालाही. खरे तर आमच्या या मोठ्यांच्या खोट्या, आडमुठ्या, रुसव्या-फुगाव्यांच्या आणि कुजक्या अपेक्षांच्या दुनियेत त्या निष्पाप जीवाचा काहीही दोष नसताना त्याला शिक्षा का? त्याला हवेत तेच लोक ज्यांच्याबद्दल माझे एक वेगळे मत आहे. मग मी माझा निर्णय त्याच्यावर का लादावा? त्याला वडिल हवे असतील तर? मी त्याच्यावतीने निर्णय का घ्यावे?"
आणि इथे तो तिच्या मदतीला धावून आला. तिच्या आतल्या प्रवासाची किंचितशीही जाणीव नसताना अचानक त्याने तिला हाक मारली आणि परत चल, म्हणाला. त्यालाही त्याची चूक उमगली होती? का तिचे परतणे त्याच्या मदतीशिवाय शक्य नाही, हे त्याला कळले होते? कारण कुठलेही असो. पण तो तिला परत चल म्हणाला. आणि परत जाण्याआधी तो तिच्याशी बोलणार होता. सारे काही आणि अगदी स्पष्ट व खरे. 
कदाचित त्या संवादातूनच तिच्या परतीची वाट सुकर होणार होती. 
(क्रमशः)
वर्षा वेलणकर 

No comments:

Post a Comment