Saturday, May 25, 2013

मामाचा गाव

आयुष्यात काही गोष्टी अशा असतात कि त्या नाहीत म्हणून काही बिघडलेलं नसतं. पण त्या नाहीत याची जाणीव हळवं करते. एकदिवस पहाटे फिरायला गेले आणि त्यादिवशी वेगळा रस्ता खुणावत होता आणि मी माझ्या स्वभावाप्रमाणे तिकडे गेलेही. तसं  आता पुण्यात रिकामं असं काही सहसा दिसत नाही. पण पाषाण सारख्या भर वस्तीच्या आणि उंच इमारती भरपूर असलेल्या भागातही एक रिकामा प्लॉट दिसला. त्याच्या समोरच्या खडकाळ पायवाटेने मनाला भुरळ घातली. आणखी एक गोष्ट तिथे होती जी मला खेचत होती. त्या रिकाम्या प्लॉटवर असलेलं आंब्याचं एक झाड. त्या एका दर्शनानं क्षणात आयुष्यातील २५-३० वर्ष डोळ्यासमोर तरळून गेली. तसं या वर्षांमध्ये खूप काही होतं. पण ठळक असं काही होतं तर ते माझ्या मामाचं गाव आणि त्यांची आमराई! 


मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील हे एक गाव - वायगाव. हळदीच नाही. तशी इतर काही ओळखही नाही या गावाची. पण ते आमच्या मामाचं  गाव आहे. नागपूर ते हे गाव हा प्रवास अंगावर काटा आणणारा असायचा. पण तेव्हा त्याची पर्वा नव्हती. कदाचित तेव्हा शिक्षणाने आणि शहरात राहून अंगावर चढलेला माज नव्हता. म्हणून सुट्या लागल्या कि आई बरोबर मामाच्या गावाला जायला मिळणार याचा आनंद व्हायचा. वाड्यासारखे खूप मोठे घर, भरपूर नातलग आणि घरापासून काही अंतरावर असलेला मामाचं शेत आणि त्यातील विहीर आणि १०० आंब्याची झाडं! आता त्यातील कितीतरींची नावंहि आठवत नाही. पण खोबऱ्या, लाडू आणि लोणच्याचा आंबा आठवतो. त्यातील खोबऱ्या माझा सगळ्यात आवडता कारण तो कच्चा देखील त्याच्या नावाप्रमाणे होता. त्याला तिखट मीठ आणि जिरे पूड लावून खाणं पर्वणी असायची. म्हणून प्रत्येक उन्हाळा हवाहवासा वाटायचा कारण तेव्हा आम्हाला मामाकडे जायला मिळायचं. 

गावात बस थांबली कि मामा आणि मामेभाऊ घ्यायला यायचे. घरापर्यंत पोचेपर्यंत वाटेतच अर्ध्या गावाशी गप्पा व्हायच्या. शहरात राहणारी एक आपल्या गावातील मुलगी मुला-बाळांना घेऊन माहेरपणाला आली आहे याची वर्दी गावाला लगेच मिळायची. माझा आईचं  नाव मालती. तिला गावातल्या सगळ्या म्हाताऱ्या आज्या मोलाबाई म्हणतात. का ते ठाऊक नाही. पण हि लेक त्यांच्यासाठी किती मौल्यवान आहे हे त्यांनी घेतलेल्या नावापेक्षा त्या मारलेल्या हाकेत जास्त जाणवायचं. तेव्हा हे सगळ कळण्याची अक्कल नव्हती. पण आता मात्र ते कळलं आहे. आईचा लाड व्हायचाच. पण आमच्या चेहऱ्यावरून फिरणारे ते खरखरीत हात आणि त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यांवरील प्रेमळ भाव तेव्हा पेक्षा आता जास्त आठवतात. कदाचित ते गमावल्यानंतर हे सारं काही जाणवत असावं. आठवलं कि अस्वस्थ वाटतं. 

स्वागत जंगी असायचं. त्यात आम्ही शहरातून परीटघडीच वागणं-बोलणं घेऊन जायचो. त्याचं  कौतुक व्हायचं. पण सांगितला ना, तेव्हा अक्कल नव्हती म्हणून कळलं नाही. या कौतुकामुळे एक वाईट झालं. आपणही असं या शहरातील मुलांप्रमाणे व्हावं हि स्पर्धा आम्ही नकळत गावात नेली आणि त्याचाच परिणाम कि काय तिथली मुलं आता शिकून सवरून शहरांकडे धावत सुटली आहेत. त्यांनाही mall आणि branded कपड्यांची भुरळ पडली आहे. एक वेगळी lifestyle त्यांना हवी आहे. चूक काहीच नाही त्यात. पण गाव त्यांना नकोस झाला आहे. शहरातील चैन पूर्ण करण्यासाठी आणि हि lifestyle maintain करण्यासाठी त्यांनी आपल्या वडलोपार्जित शेतजमिनी अगदी सहज विक्रीस काढल्या आहेत. गावात तरुण कमी आणि फक्त म्हातारे जास्त दिसू लागले आहेत. अस का, म्हणून विचारायची सोय नाही कारण त्यावर मोठी चर्चा घडते आणि एक बोट आपल्याकडेही दाखवल्या जायील याची खात्री आहे. 

गेले तीन चार वर्ष मी हि तिकडे गेले नाही. पण आठवण येते. आणि म्हणूनच सुशिक्षिततेचा सगळा आव बाजूला सारून मी त्यादिवशी त्या आंब्याच्या झाडाकडे गेले आणि कुणाचीही परवानगी न मागता - ती द्यायला खरच कुणी नव्हत तिथे आणि अजूनही नाही - मी त्या झाडाच्या दोन कैऱ्या तोडल्या. हातातून निसटून गेलेलं  ते गाव त्या दोन कैऱ्यांमध्ये शोधण्याचा तो कदाचित एक चिमुकला प्रयत्न असावा.

वर्षा  वेलणकर     

Tuesday, April 30, 2013

पानगळ….

आठवणी जागवणं म्हणजे सुकलेल्या पानांवर पाण्याचा वर्षाव करण्यासारखा वाटतं. जे झालं त्यातील काहीच बदलणार नसतं आणि तरीहि त्याचा मागोवा घेणं म्हणजे सरून गेलेल्या वयाच्या शरीरावरील खुणा पुसण्याचा प्रयत्न करणं. पण आठवणी सोबत असतात. कायम. कधी वाऱ्याच्या झुळूकीसारख्या येतात. उन्हाळ्यात आल्या तर घाम वाळवत नाहीत पण सुखावून जातात. कडक हिवाळ्यात आल्या तर अंगावर काट फुलतो आणि काटे बोचरे असतात. पावसाळ्यात आठवणी म्हणजे काहीतरी वाहून नेणार नक्की. कधी शरीरातील गर्मी, कधी मनात साचलेला मळ आणि कधी कधी जे सगळ्यात प्रिय आहे तेच वाहून जातं; गमावल्याच दुःख मागे ठेवून.
 
आठवण दिसते. उन्हात तपातेल्या फरशीवर बदलीभर पाणी ओतलं कि काही वेळ खूप काही जाणवत राहतं - मातीच वास, थंडगार स्पर्श आणि थोडं गार वारही. पण पुन्हा फरशीवर कोरडेपणाचे तुकडे पडून ते वाढू लागतात तेव्हा वर्तमान आणि आठवण त्यात दिसतात. बादलीभर पाणी म्हणजे आठवण, तो क्षणभर आलेला थंडावा म्हणजे आठवण आणि ते कोरडेपणाचे भराभर वाढत जाणारे तुकडेही आठवणच होतात - थोडावेळ अनुभवलेल्या थंडाव्याची.
 
फोफावलेल्या वेलीवरची काही पानं वाळून सुकली तर त्यांना पाणी घालून उपयोग नसतो. आयुष्य पुढे पुढे जात आहे आणि कोवळी पानं जन्माला घालतानाच या आयुष्याच्या वेलीवर काही वृद्ध सुकलेली पानही दिसू लागली आहेत. काही घटना वाळल्या आहेत आता. पण त्याचं अस्तित्व नाही संपलं. कोरड्या झाल्यात त्या आणि आता तर निष्प्राणहि. पण दिसतात त्या नजरेला. पानं खुडून फेकून दिली तरीही जिथे उगवलं होतं ती खूण राहते फांदीवर तशीच. फेकून देतानाही सुकलेल्या पानाचा चुर्र आवाज होतो. काही आठवलं कि हे अस सगळ वाटतं. आठवण फांदीवर उगवली ती जागा, पानांचं वाढत जाणं, त्याचा आकार, रंग-रूप बदलणं आणि मग पिकून जाणं. सारा काही नजरेसमोर दिसतं. वाळलेलं पान खुडून टाकावं म्हणतात. पण खुडायला गेल तर सहज नाही तुटत ते. थोडा जीव असतो त्यात आणि म्हणून ते फांदीवर असतं. आणि ते असतं तोपर्यंत सारं काही असतं. आठवण असते - कधी प्रिय तर कधी अप्रिय, कधी हवी-हवीशी वाटणारी आणि मग नकोशी होत गेलेली, कधी आयुष्याच्या वेलीवर जीव ओतून जगवलेली आणि आता अगदी खुडून टाकावीशी वाटणारी.
 
पण निसर्गाचा नियम आहे म्हणतात. जे उगवलं ते जगतं आणि जातही. पान उगवतं, वाढतं, रंग बदलतं, पिकतं, वाळतं आणि एक दिवस खुडायची घाई केली नाही तर गळून पडतं. तुमचं लक्ष नसेल तर कुठलाही चूर्र आवाज न करता वाऱ्याच्या झुळुकीबरोबर कुठेतरी निघूनही जातं. मग वाटच पाहावी. काही आठवणींच्या पानगळीची .
 
वर्षा वेलणकर 

Tuesday, April 23, 2013

जागतिक पुस्तक दिवसानिमित्त...

जागतिक पुस्तक दिवसानिमित्त...
 
तसे कुठलेही दिवस वगैरे पाळायचे हा प्रकारच मुळात मला कधी आवडला नाही. पण पूर्वी ते पाळायचे नाही, हा हट्ट असायचा आणि आता ते डोक्यातही येत नाही. पण आज जागतिक पुस्तक दिवस आहे हे पाहिलं आणि वाटलं कि आज काहीतरी लिहावं. कारण मला वाचायला आवडतं. खूप आवडतं. कदाचित प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं असतं  आणि ते वेगळं काहीतरी पुस्तक आणि कथांमध्ये जितकं सहज मिळतं तितकं  ते इतर वेळा शक्य नाही. खरं  तर प्रत्येकाला परीकथा आवडतात आणि ती आपलीही असावी असा वाटतं. हा आभास पुस्तकातून नेहमी पूर्ण होताना लहानपणी तरी अगदी जाणवतोच. ते जे काही असेल नसेल, पण मला वाचायला आवडतं. 
लहान होते तेव्हा घरमालकाच्या मुलाकडे एक aluminium ची पेटी होती आणि त्यात तो पुस्तकं  ठेवायचा. जादूचा दिवा, काचेचा महाल, सोनेरी उडणारा घोडा, राजकन्या आणि पोपट अशी भरमसाठ पुस्तक तेव्हा त्यानं गोळा  केली होती आणि ती आम्हाला वाचायला मिळायची. त्यानंतर चंपक, लोटपोट, चाचा चौधरी, फास्टर फेणे, शिवाजी महाराजांच्या गोष्टी असं  ते वाचन विश्व विस्तारत गेलं. शाळेच्या वाचनालयाची ओळख पाचवीत असताना झाली आणि त्याच कारण होतं  वाचन स्पर्धा. त्यात भाग घेतला आणि वाचनालयाच्या प्रेमात पडले. किती वाचलं  हे नाही सांगता येत. नेमकं  जे वाचलं  ते सगळं  योग्य होतं  का, हेही निश्चित सांगता येणार नाही. शिवाय एक विशिष्ट विषय वाचला तो का, वगैरे प्रश्नही मला कधी सतावत नाही. ते हाती आलं  ते आवडलं  तर वाचत जायचं एवढा साधा हिशोब होता आणि त्याचा खूप खूप फायदा झाला. आनंद वाटतो कि नशीबवान होते हे सगळं  काही वाचता आलं . देवळात गेले नाही इतक्यावेळा मी पुस्तकाच्या दुकानात जाते. आणि ते सारे कपाटातले रचलेले देव पाहिले कि होणारा आनंद अवर्णनीय असतो. 
वाचलं  म्हणून लिहायची सवय जडली आणि त्या सवयीमुळे नोकरी मिळाली. पण त्या नोकरीत लिहित असताना वाचायचं राहून गेलं. गेले चार वर्ष नोकरी सोडली आणि पुन्हा वाचन यज्ञ सुरु झाला. इतकं  वाचतो आपण पण लक्षात राहून जाणारं फार कमी असतं. आज मला ठळक आठवतात अशी माझी आवडीची पुस्तकं  म्हणजे मृत्यूंजय, खलिल जिब्रानचं  The Prophet, ग्रेस याचं मितवा, रिचर्ड बाखचं जोनाथन livingstone सीगल, पु लची सगळी पुस्तकं, पाउलो कोएलोचं pilgrimage आणि द अल्केमिस्ट, त्यांची आत्मकथा. त्यांची तर सगळीच पुस्तकं  मी वाचली आहेत. पण एका पुस्तकान मला गेले काही दिवस अक्षरशः झपाटलं आहे आणि ते म्हणजे अ टेल फॉर द टाइम बीइंग. एका जपानी-अमेरिकन लेखिकेनं - रुथ ओझेकी - लिहिलेलं  हे पुस्तक फक्त अप्रतिम नाही पण खूप मनस्वी आहे. शिवाय ज्यांना कथा सांगण्याची आवड आहे - लिहून किव्वा प्रत्यक्ष - त्यांच्यासाठी तर हे एक आदर्श पुस्तक ठरेल कारण विषयाची गुंफण, कथेचा आवाका उत्कंठावर्धक पद्धतीनं सांगतानाच किती विषय एका कथेत हाताळता येतात हेही हे पुस्तक वाचताना कळत. 
पुस्तकांची आवड असणाऱ्यांना जुनी, दुर्मिळ पुस्तकं  कुठे मिळतील याची माहिती असणारा महाराष्ट्र टाइम्स मधला लेखही छान आहे. पण  त्यात फक्त मुंबईच्या अशा दुकानांचा उल्लेख आहे. शक्य असेल तर प्रत्येकान त्यांच्या शहरातील अशा दुकानांची माहिती काढावी आणि शेअर करावी म्हणजे अनेकांना ते सोप जायील. पुण्यात अशी बरीच ठिकाणं  आहेत. आज या दिवशी अशी दुकानं  शोधून त्यांची यादी करायचा मी निश्चय करते. बघू किती लवकर शक्य होतं ते. 
 
वर्षा वेलणकर 
 
  

Monday, April 8, 2013

वाटता वाटता वाटले, तैसे केले…

वाटता वाटता वाटले, तैसे केले…

 
खूप काही वाटतं आणि कायम वाटत राहतं. मला वाटतं म्हणून मी जे वाटतं ते करण्याचा प्रयत्न करते आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मला वाटतं ते इतरांना कळवणे. पण कधी कधी असंही वाटतं कि कुणी तरी आपल्याला न सांगताही समजून घ्यावं. एक शब्दही न उच्चारता कुणी तरी एखाद्या पुस्तकाप्रमाणे आपल्याला वाचून काढावं. छे! अशा वाटण्याला काही अर्थ नसतो आणि ते कधीच पूर्ण होत नाही. पण वाटून घ्यायला काय हरकत आहे?
चार वर्षांपूर्वी जेव्हा मी या एका विचारावर खूप दिवस रेंगाळले तेव्हा लक्षात आलं कि हे वाटणं खूप खोल रुजलेलं आहे आणि त्याची सुरुवात मी शाळेत असताना झाली. खूप पाऊस पडतो आहे आणि जरी वर्गात बाई शिकवत असल्या तरी मला मात्र बाहेर पडणारा पाऊसच पाहायचा आहे, हे माझं वाटणं त्या शिक्षिकेला कळावं असं खूप प्रकर्षानं वाटलं. पण हे असं काही विचार करणं आणि ते प्रत्यक्षात येईल हि अपेक्षा करणं मूर्खपणाचं असतं हा साक्षात्कार व्हायला खूप वर्ष लागली. पण तेव्हा मला आणखी काहीतरी वाटलं. मला शाळेत परत जायची इच्छा झाली आणि मला त्या विद्यार्थिनींशी गप्पा माराव्याश्या वाटल्या. या वाटण्याचं काय झालं माहिती आहे? मी गेले परत शाळेत.
काही कारणाने मी माझी शाळा अजूनही गमावलेली नाही. माझ्यात माझी शाळा कायम आहे कारण तिथे जे काही मिळालं ते आजही माझी सोबत करतंय. पण शाळाही मला विसरली नाही. मला शिकवणाऱ्या काही शिक्षिका अजूनही आहेत तिथे आणि म्हणून मला पुन्हा परत जाता आलं. गेले आणि सांगितलं मला मुलींशी गप्पा करायच्या आहेत. कसल्या गप्पा? प्रश्न स्वाभाविक आहे आणि मला तो अपेक्षित होताच. म्हणून माझं उत्तरही तयार होतं . म्हटलं, त्यांच्या मनात जे सुरु असतं ना ते मी त्यांना बोलायला सांगणार आहे. अनेकांना मनातल्या मनात हसू आलं असेल. हेही स्वाभाविक होतं आणि मला अपेक्षितही. म्हणून पुन्हा माझं उत्तर तयार होतं. यावेळी प्रश्न नसतानाही. मी म्हणाले कि कुणाच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला मी काही अंतरज्ञानी नाही. पण मला जे मनापासून वाटतं ते कृतीत येतं आणि कुणास ठाऊक मी जाणून घेण्यात यशस्वी ठरेनही. मला परवानगी मिळाली. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षिका आणि संस्थेचे संचालक यांचे मन:पुर्वक आभार.
आणि त्यानंतर सुरु झाल्या गप्पा. काही वर्षांपूर्वी मी ज्या स्थितीत होते तिथे आता या मुली होत्या आणि मी त्यांची ताई झाले होते. आणि या गप्पा इतक्या रंगल्या कि सलग दीड वर्ष आम्ही बोललो. खूप काही आणि सगळ्या विषयांवर अगदी मनसोक्त बोललो. कधी हसलो, रडलो, कधी गप्प बसलो आणि कधी गाणी म्हटली, नाचलो, हुंदडलो. मला जे कधीतरी वाटलं होतं ते मी फक्त त्यांना विचारला कि तुमच्या मनात काय सुरु आहे ते कुणाला तरी कळावं असं तुम्हाला वाटतं का आणि त्यांनी होकार भरला. नशीबानं मी माझ्या वाटण्यावर सतत विचार करत राहिले त्यामुळे त्याचं मन आणि वाटणं काय आहे हे जाणून घ्यायला मला वेळ लागला नाही. मी त्यांच्या वाटण्याला शब्द देत राहिले आणि त्यांनी मंजुरी दिली. कुणी जाणून घ्यावं इतकं छोटंसं काहीतरी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला मला आणि वाटलं माझं वाटणं सार्थ झालं.
आज हे सारं सांगावसं वाटलं कारण गेले काही महिने या गप्पांना खंड पडला आहे आणि मला वाटतं त्या पुन्हा सुरु व्हाव्यात. म्हणून मला वाटतं कि प्रत्येकानं स्वतःला जे वाटतं ते करावं. कधी कुठली अपेक्षा पूर्ण होइल कुणास ठाऊक!
वर्षा

Thursday, March 28, 2013

Finding one another....

दोन गोष्टी आयुष्यात खूप ऐकायला मिळतात. सूचना आणि प्रतिक्रिया. जे काही आपण करतो त्यासंदर्भात या सूचना आणि प्रतिक्रिया मिळतातच मिळतात. यातून कुणाचीही सुटका नाही. पूर्वी फक्त वयाने मोठे किव्वा जे ज्ञानाने मोठेपणा मिळवलेले होते त्यांनी केलेली सूचना पाळावी आणि स्वीकारावी असा प्रघात होता. केलेल्या कृतीवर असे मोठे लोक काय प्रतिक्रिया देतील याचीही उत्सुकता असायची आणि वचकही होता. पण त्याचा कदाचित अतिरेक झाला आहे आणि आता, हम भी पीछे नही, म्हणून प्रत्येक जण सूचना आणि प्रतिक्रिया देताना आढळून येतो. खरं सांगू का, मलाही आवडत नाही सूचना आणि प्रतिक्रिया. द्यायला आणि घ्यायलाही. एखाद्या वाहत्या नदीवर बांध घालण्यासारखं असतं ते.
कधी कधी जरा एखाद्या विचाराचा किस पाडला आणि त्याकडे निरखून पाहिल कि वाटतं तसं सारं कसं सोप होतं पण उगाच खूप complicated केल्या गेलं आहे. Action आणि reaction हे सगळं अगदी बरोबर आहे. पण जरा निरखून पहा, आपण प्रतिक्रियात्मक जगतो आहे. आणि सुचनानवर सुद्धा. लहानपणी सूचना …. असं नाही तसं, हे योग्य आणि ते बरोबर किव्वा हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही आणि असंच खूप खूप आणि खूप काही. मग या सगळ्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया म्हणजे कधी मान मोडून ऐकून घेणे नाहीतर बंडखोरी आणि त्यावर आणखी प्रतिक्रिया. एक वाक्य त्यात असतंच, हि आजकालची मुलं ना अगदी डोक्यावर बसली आहेत वगैरे वगैरे.
यावर एक प्रतिक्रिया नक्की येणार, कि मग काय मोठ्यांनी काही बोलूच नये? आणि प्रतिवाद काहीसा असा असेल, मग लहान्यानी काय फक्त ऐकायचंच का?
या दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत आणि मुळात माझा मुद्दा काही वेगळाच आहे. म्हटलं ना कि action आणि reaction असणारंच. पण त्यात originality, ज्याला मी नैसर्गिक स्वभाव आणि असणं म्हणते, ते मात्र कुठल्या कुठे गुडूप होतं. प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीला एक व्यक्तिमत्व, सोप्या भाषेत ज्याला personality म्हणतात, ती असते. त्याचा मातीत म्हणजे जगात, वातावरणात रुजण्याचा आणि वाढण्याचा एक वेग असतो. त्याला मिळालेल्या वातावरणाचा आणि पोषक घटकांचाही त्यात वाटा असतो. माती कशी आहे, पाणी पुरेसं आहे कि नाही, ऊन, वारा बरोबर मिळतय कि नाही. हे सारं काही त्यात समाविष्ट असतं आणि त्यावर आधारित ते व्यक्तिमत्व घडतं. खरं तर सूचना आणि प्रतिक्रिया म्हणजेच खत-पाणी. पण कुणाला कुठलं खत आणि किती पाणी आवश्यक आहे यावर चिंतन खूप गरजेच आहे. ज्याला जे हवं ते आणि जितकं हवं तितकंच मिळावं. आणि यासाठी जो देतो आहे त्याला, ज्याला दिलं जात आहे त्याच्या नैसर्गिक स्वभावाची माहिती हवी. जो घेतो तो जर वयाने आणि बुद्धीने थोडा जाणकार असेल तर त्यानंही आपल्या गरजांना ओळखण्याची गरज आहे. काय हवं नको हे स्वतःला जोपर्यंत पुरेपूर कळत नाही तोपर्यंत उत्तर देण्याचा अधिकार मिळत नाही. मिळायलाही नको. पण तो अगदी खेचून घेतला जातोय, हा नवीन ट्रेंड आहे.
दोन व्यक्तिंमधली दरी जर वाढली आहे तर त्याला कारणीभूत हे आपलं परस्परांना न समजणं आहे. Originality काय आहे हे जर कळलं तर प्रश्न सगळे खल्लास होतात. कारण मग conflict राहत नाही ना, बरोबर? पण इतक सोपं नाही ते. Originality जाणून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. Patience ठेवावं लागतं आणि हे कितीही गंभीर वाटत असल तरी त्यात असलेली जी मजा आहे ती लुटावी लागते. तेव्हा कुठे मग आपण आपल्यालाच दिसायला लागतो. पाणी खळाळलेलं असेल तर तळ दिसत नाही. पण शांत होण्याची वाट पाहिली कि सारं काही स्पष्ट दिसतं. मग नदीकाठावरची गम्मत आणि त्याच नदीची खोली पाहणं एक अलौकिक अनुभव ठरतो.
ग्रेस या कविबद्दल बोलताना महेश एलकुंचवार म्हणाले कि वाचकालाही काहीही वाचाण्यासाठीचा रियाज आवश्यक आहे. ग्रेस दुर्बोध वाटत असतील वाचताना तर तुमचा वाचनाचा रियाज कमी आहे हे कबुल करण्याची तयारी हवी. आजकालची मुलं आणि याचं काही कळत नाही असं जर वाटत असेल तर तुमचा त्यांना जाणून घ्यायचा रियाज कुठे कमी पडला ते पाहावं लागेल ना?
Just a thought....give a thought to it....
 
Varsha

Saturday, March 9, 2013

९ मार्च, २०१३
गुलज़ार साब,
आज आपसे मिलनेका दिन शायद मुक़र्रर था। कई साल हो गए है आपके अल्फाजोसे रिश्ता जोडकर। पर उस रिश्तेका कोई नाम नहीं था और ना हीं कभी कोई दिखनेवाला वजुद। हा, पर वो जिंदा था। आज जब आपके पाँव छूने के लिए हाथ बढ़ाये तो आपने कहा "जीते रहो!" जिन्दा तो है हम। क्योंकि साँसे चल रही है. पर जब कभी अहसास की बात चली तो आपसे लफ्ज उधार लेते चले गये हम। कभी ख़ुशी में तो कभी गम में। नाराज हुए तब भी और प्यार किया तब भी। कभी कही कोई रिश्ता, कोई एहसास, कोई सपना, कोई अपना बया करनेकी बात आई तो आपहिकी सहिसे लफ्ज जड़ी तकरिरोका सहारा मिला। बदलेमें कुछ देना नहीं था हमें आपको। इसलिए लेना और आसन हो गया।
 
आज आपसे मिलने का दिन मुक़र्रर था। शाम आप एक फंक्शन मे लोंगोसे मुखातिब होनेवाले थे। मै भी आना चाहती थी। लेकिन आप और हम लोगोंमे एक दीवार है जो आपको हमसे ऐसेही मिलने नहीं देती। उसी दीवारसे झांकने का इरादा था। झरोखा ढुंढने सुबह सुबह आई तो सामने आपको पाया। आप किताबोंके बीच खड़े थे और कुछ चुनिन्दा लोंगोंसे घिरे थे। नजर आपकी वही थी किताबोंपर। कभी चश्मा उतारकर तो कभी चढाकर आप एक-एक कोना जांच रहे थे। फिर आपकी वही खरजवाली सुकुनभरी आवाज में आपने कहा, "prose बहोत है यहा. पोएट्री कम है।" सही कहा आपने। आजकल लोग बड़े प्रैक्टिकलसे हो गए है। सब कुछ सुलछा हुआ चाहते है। कठिनाई पसंद नहीं उन्हें। जो कुछ कहो इनसे तो वो बिलकुल तरतीब से सजा हुआ, एकदम स्पष्ट। किसी चीज की कोई परते खोलना उन्हें झंझट लगती है। रिश्तेभी इन्हें साफसुथरे, सुलछे हुए चाहिये। प्यार तो प्यार, नाराजगी तो नाराजगी. और जब रिश्तोंमे कोई गाँठ लग जाये तो ये डोर तोड़ देते है। अगर उनसे कहों के, "हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छूटा करते". तो ये पलटकर जवाब देते है, "Come on यार, किस जमाने की बात कर रहे हो?"
 
खैर, जाने दिजिये। बात बस इतनी थी के आज आपसे मिलने का दिन मुक़र्रर था। शाम को नहीं सुबह्का वक्त तय था। आप बिलकुल वैसे ही लग रहे थे जैसे आप हमेशा होते है। जैसे आपको तसवीरों और टीवी पे देखा है। हमेशा की तरह वो सफ़ेद कुरता और पैजामा। सफ़ेद मोज़े और सफ़ेद स्पोर्टवाले जुते। आपका कुरता वैसेही कड़क था स्टार्च किया हुआ और बहोत सारी सिलवटोंसे भरा। पर फिर भी कड़क था। तना हुआ। हर उस शोहरतमंद इन्सान की तरह जिसे लोग ऊँचा तो उठाते है पर कभी कोई इतनीसिभी बात हो जाए तो उंगली उठानेसे भी नहीं चुकते। वो सारी सिलवटे चुभती तो है पर शख्सियत की मजबुतीकोभी बया करती है।
 
तो बात ये है, के आज आपसे मुलाकात हुयी। आपके पास आकर बैठने का मौका मिला। आपने नाम पूछा, काम पूछा। जब मैंने कहा के पिछले दिनों आपसे कांटेक्ट करना मुशील हो रहा था, तो आपने वो दीवार भी हटा दी जो आपसे मिलनेसे रोकती है। और जो किताब मैंने आपके हाथों में धर दी थी उसपर आपने लिखा, वर्षा, टू यू, गुलज़ार।
 
एक बेनाम रिश्ता जो आपके लफ्जोसे कई साल पहले जुड़ा था आज आपके हाथोने उस रिश्ते को एक पहचान दी है। अभीभी मै उस भीड़ का हिस्सा हु जो आपसे मुखातिब होना चाहती है। आपकी लफ्जोकी उधारी पर जीना चाहती है। कुछ सहिसे लफ्ज जड़कर आपसे कहना चाहती है के, गुलज़ार साब, वुई लव यू!
 
Varsha Welankar

Wednesday, March 6, 2013

आयुष्य सोपं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मला खूप प्रश्न पडतात. पण एक दशक आधी पडायचे त्याहून प्रमाण जरा आताशा कमी झालंय. पण प्रश्न आहेत अजुनहि. जिवंत असण्याचं ते लक्षण आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. हं …तर मुद्दा किव्वा प्रश्न असा कि आयुष्य किव्वा आपण त्याला जगण म्हणू या, ते सोप्प कसा करायचं. अर्थात मी जे काही आता लिहिणार ते फक्त माझ्यापुरत आहे आणि ते माझे वैयक्तिक विचार आहेत. पण जमाना शेयरिंगचा आहे म्हणून ते इथे देण्याची उर्मी थोपवणे जरा अवघड आहे.
हा प्रश्न पहिल्यांदा कधी पडला ते आता आठवत नाही. पण तो डोक्यात गेली कित्येक वर्ष ठाण मांडून आहे. त्याचा त्रास कधी झाला नाही. पण मला उत्तरं शोधायचं होतं आणि मी त्यासाठी काहीना काही प्रयत्न सतत केले. माझं जगण सोप्प करायचं तर मला ते इतरांपासून वेगळं करावं लागणार, हे या प्रश्नाच्या उत्तरातील पहिल उत्तर होतं. वेगळ म्हणजे स्वतंत्र! आता पुन्हा प्रश्न, माझ्यासाठी स्वातंत्र आणि त्याचा अर्थ काय? निव्वळ आर्थिक स्वातंत्र? कि मला वाटेल ते करता येण्याची संधी? कि माझे निर्णय मला घेण्याची मुभा? कि कुणीही माझ्या कुठल्याही कृतीसंदर्भात स्वतःकडे जबाबदारी न घेणे? म्हणजे मी केलेल्या चुकांची (समाजाच्या दृष्टीकोनातून असलेली चुक. मला ती चूक म्हणून मान्य असेलच असे नाही.) जबाबदारी फक्त आणि फक्त माझी. माझ्या कुटुंबातील कुणालाही त्याबद्दल दोष दिल्या जाऊ नये, असे स्वातंत्र मला अपेक्षित होते का? होते का, असं म्हणतेय कारण हि सगळी चर्चा माझ्यापुरती मी केली त्याला एक दशक उलटून गेल आहे.
खरं तर जे काही वर लिहिलं ते सगळं मला त्या स्वातंत्र्यात अपेक्षित होतं. आणि आहे ही. आर्थिक स्वातंत्र्यासाठी नोकरी करणे अपरिहार्य होतं. ती मिळवली आणि अठरा वर्ष केली. पण स्वतंत्र होताना कुणाचीही सोबत नको असाही माझा आग्रह होता. कारण मदत घेणे म्हणजे स्वातंत्र नाही, हे हि कुठेतरी डोक्यात होतं. मदत करणारा कुठलं डोमबल्याच एकट जगू देणार? मदतीची परतफेड करावीच लागणार न! मग कसलं स्वतंत्र होण? पण सोबत करणारा जर माझ्या विचारांशी सहमत असेल तर? सुदैवाने मला अशी सोबत मिळाली आहे.
मग माझं जगण खरच सोप्पं झालं का? प्रामाणिक पणे सांगायचं तर तो प्रश्नच मी माझ्या डोक्यातून डिलीट केला होता. आज हे सगळं असं पुन्हा समोर आलं कारण आज सकाळी मला साक्षात्कार झाला कि माझं जगण खूप साधं, सरळ आणी सोप्पं आहे. कारण मला आयुष्यात काय करायचं आहे ते पक्क ठाऊक आहे. त्याची दिशा ठरली आहे आणि आता तर त्यादिशेनं वाटचालही सुरु झाली आहे. कुठलाही साक्षात्कार खूप आनंददायी असतो आणि आनंद हा इतराशी शेयर केला तर तो आणखी वाढतो. म्हणून हा लिखाणाचा उपद्व्याप!
खरच आयुष्य सोप्पं असतं. फक्त एकदा स्वतःची झाडाझडती करावी लागते. कुठे काय आहे दडलेलं ते शोधावं लागतं. त्या गुप्त ताकदीचा अंदाज घेत काही निर्णय घ्यावे लागतात. आणि असं करताना जे स्वातंत्र आपल्याला अपेक्षित आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा असतो. वाटतंय का हे सगळं सोप्पं आहे? मला विचारलं तर मी हो म्हणणार. तुम्ही तुमचं उत्तर शोधा. शुभेच्छा!
वर्षा वेलणकर